![]() |
तहसीलदार प्रशांत पाटील पूजन करतांना |
संग्रामपूर (आकाश बोरसे) : तालुक्यात महसूल विभागाचे राजस्व अभियान सध्या सुरू असून शंभर दिवसाच्या उपक्रमांतर्गत तालुक्यातील पाणंद रस्ते मोकळे करून देण्याचा उपक्रम सध्या जोरात सुरू आहे. उपक्रमांतर्गत आज महसूल विभागाच्या वतीने संग्रामपूर तालुक्यातील काकणवाडा शिव दांड शेत रस्ता शेतकऱ्यांसाठी मोकळा करून देण्यात आला. सदर रस्ता मोकळा झाल्याने या शिवारातील ३० ते ३५ शेतकऱ्यांच्या रस्त्याची समस्या आज दूर झाली आहे.
रस्ता मोकळा करून देण्यासाठी तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केलेल्या आवाहनाला या शिवारातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गेल्या २५ ते ३० वर्षापासून हा रस्ता बंद होता. काही ठिकाणी अतिक्रमण सुद्धा झाले होते तर काही भागात काटेरी झाडे वाढल्याने रस्ता बंद होता. त्यामुळे शेतात जाणे-येणे, शेतातील माल घरी आणणे मुश्किल होऊन बसले होते. रस्ता मोकळा करून द्या अशी मागणी या शिवार परिसरातील शेतकरी नेहमी करीत होते. यावर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी पुढाकार घेऊन या शिवारातील शेतकऱ्यांची बैठक घेतली व शेतकऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न निकाली निघावा यासाठी प्रबोधन केले. यावर शेतकऱ्यांनी त्यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. (युवा क्रांती वृत्तसेवा)
Social Plugin