बुलडाणा (युवा क्रांती वृत्तसेवा) : जिल्ह्यात मान्सून पूर्व पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे वातावरणात बदल होऊन वेगवेगळे जलजन्य व कीटकजन्य याचे प्रमाण वाढवून साथीचे आजार होण्याची शक्यता आहे. यासाठी नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छते बरोबर फळे, पालेभाज्या मिठाच्या पाण्यात धुवावीत तसेच प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते सर यांनी केली आहे.
सध्याचे वातावरण हे जीव जंतूसाठी पोषक आहे. त्यामुळे जंतुसंसर्ग होऊन साथीचे आजार लवकर पसरतात. पावसाळ्यात ताप, सर्दी, खोकला, अतिसार, जुलाब, हिवताप डेंगू, चिकणगुण्या, स्वाईन फ्लू, कावीळ, कॉलरा असे आजार होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात सांधेदुखी, अस्थमा आमवात, पचनाचे आजार आम्लपित यासारख्या जुनाट व्याधी देखील होतात. म्हणून योग्य पद्धतीने काळजी न घेतल्यास आजाराची तीव्रता कमी अधिक प्रमाणात जाणवते.
मान्सूनपूर्व पाऊस असला तरी गावांमध्ये पाणीपुरवठा होत असतांना गढूळ पाणी ही येऊ शकते. अशावेळी तुरटीचा वापर करावा ताप, सर्दी, खोकला याची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. त्यासाठी शासकीय रुग्णालयात तपासण्या मोफत होतात. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. जेणेकरून डासाची निर्मिती होणार नाही. घरी सर्वेक्षण करणाऱ्या आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकांना सर्वेक्षणासाठी मदत करावी. पावसाळ्यात पाणी उकळून प्यावे, पिण्याच्या पाण्यामध्ये मेडिक्लोरचा वापर करावा. रस्त्यावरील उघडे पदार्थ व शिळे अन्न खाऊ नये. गटारीत साचलेले पाणी वाहते करावे, जुने टायर नारळाच्या करवंट्या याची विल्हेवाट लावावी. पाण्याच्या टाक्या, कुलर फ्रिज यामध्ये साठलेले पाणी काढून स्वच्छ करावीत, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी केले आहे.
Social Plugin