बुलडाणा (युवा क्रांती वृत्तसेवा) : राज्यातील सर्व जिल्ह्यांचा समतोल विकास साधण्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. विकासकामांसाठी शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील उपस्थित होते.
खामगाव दौऱ्यात उपमुख्यमंत्री ना. पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांचा व प्रलंबित कामांची माहिती घेतली. त्यांनी पुढे सांगितले की, ग्रामीण रस्ते, सिंचन सुविधा, आरोग्य सेवा, शिक्षण व इतर पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकारकडून विशेष निधीची तरतूद केली जाईल. जिल्ह्यातील मागास भागांचा सर्वांगीण विकास, शेतकऱ्यांचे सक्षमीकरण आणि युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे, हे आमचे प्राधान्य आहे, असेही त्यांनी नमूद केले.
राज्याचा आर्थिक विकास समतोल होण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये सर्व विभागासाठी निधीची तरतुद करण्यात आली आहे. लाडकी बहिण व लाडका भाऊ योजनासाठी विशेष तरतुद करण्यात आली असून लाभार्थ्यांना लाभ दिल्या जात आहे. सोबतच इतर विभागावर निधीची कमतरता भासू देणार नाही,याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. अनुसूचित जाती, जमाती व आदिवासी योजनासाठी गेल्या वर्षापेक्षा जास्त तरतूद केली असून सर्वसमावेशक विकास साध्य करण्याचा शासनाचा मानस असल्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी व्यक्त केला.
Social Plugin