Breaking News

युवा क्रांती न्यूज या लोकप्रिय न्यूज चॅनेल ला महाराष्ट्रात प्रतिनिधी हवे आहेत...

मा.श्री. नितीनजींच्‍या भावविश्‍वातून उलगडलेले ‘संघातील मानवी व्‍यवस्‍थापनशास्‍त्र..!

परवा  केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्‍या लेखणीतून  साकारलेल्‍या ‘संघातील मानवी व्‍यवस्‍थापन’ या ग्रंथाचे नागपुरात विमोचन संपन्‍न झाले. लगेच हा ग्रंथ हाती आला आणि चाळता चाळता पूर्ण वाचून संपला तेव्‍हाच भानावर आलो. हा ग्रंथ केवळ ललित साहित्‍यानं भरलेलं एक पुस्तक नाही तर ती आहे एक अनुभवांची सरिता, भारतीय भावधारेची चिंतनमय गंगा, आणि भारतीय व्यवस्थापनशास्त्राचा एक मौलिक दस्तऐवज !

नितीनजी तसे लेखक नाहीत तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत, अभाविपचे पूर्व कार्यकर्ते आहेत तसेच संसदीय कार्याचा दांडगा अनुभव गाठीशी असलेले, अनेकवेळा निवडून आलेले कार्यतत्पर जनप्रतिनिधी,  कुशल प्रशासक, आणि कर्मयोगी असे केंद्रीय मंत्री म्‍हणुन देश-विदेशात परिचीत आहेत!

गडकरीजींची लेखणी ही केवळ विचारांनी नव्हे, तर अनुभवांनी ओतप्रोत भरलेली आहे. या ग्रंथात त्यांनी संघातील कार्यपद्धती, मूल्यव्यवस्था, आणि मानवी मनोविज्ञान यांना अतिशय प्रभावी आणि संयतपणे मांडले आहे. त्‍यांचे शब्द हे अनुभवांची शिदोरी असल्‍याने ते अगदी जीवंत वाटतात. ते संघाच्या शिस्तबद्ध, संस्कारित कार्यपद्धतीचे असे वर्णन करतात, की वाचक स्वतः शाखेत सहभागी असल्याचा अनुभव घेतो!

या ग्रंथात एक एक प्रकरण म्हणजे संघकार्याच्या एका अनोख्या पैलूचे सुंदर दर्शन आहे.  ग्रंथाच्या आरंभी ‘संघ स्कूल ऑफ मॅनेजमेंट’ ही संकल्पना पुढे आली असून, पारंपरिक एम.बी.ए. किंवा व्यवस्थापन संकल्पनांपेक्षा संघाची कार्यशैली मानवी मूल्यांवर आधारलेली असल्याचे अधोरेखित केले आहे. ‘शाखा: मूलस्थान व बलस्थान’ या प्रकरणात शाखेच्या माध्यमातून मनुष्य घडवण्याची प्रक्रिया उलगडली जाते. ‘कुशल संघटक’ या प्रकरणात नेतृत्ववृत्ती, निर्णयक्षमता, आणि सामूहिक उभारणी याचे मनोवेधक विश्लेषण आहे. ‘तीनदा बंदी आली तरी अजिंक्य’ हे प्रकरण संघाच्या असामान्य सहनशक्तीचे साक्षात्कार घडवते. श्री गडकरीजी हे केवळ सांगतच नाहीत, तर जगवतात! संघामध्ये व्यक्तिमत्त्व घडवले जाते आणि त्याचा उपयोग राष्ट्रकार्यासाठी केला जातो हे श्री नितिनजींनी अगदी साध्‍या, सोप्‍या शैलीत मांडले आहे. नेतृत्व म्हणजे सेवा व समर्पण हा यातुन या सहजपणे लक्षात येते. मानवसंसाधन ही संघाची खरी संपत्ती आहे. संघ कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण पद्धती, सेवा क्षेत्रातील योगदान, समाजाभिमूख नेतृत्व हे बिंदू अगदी सहज चर्चा करतो तसे श्री नितिनजींनी उलगडले आहेत.


पू. बाळासाहेबांचे विलक्षण व्‍यकतीमत्‍व व कर्मयोगी भाऊराव देवरसांच्‍या जीवनकार्याची केलेली मांडणी म्‍हणजे संघसाधनेचे अगदी जीवंत प्रगटीकरणच.  ‘संघातील मानवी व्यवस्थापन’ हा ग्रंथ म्हणजे संघाच्या जीवनपद्धतीचे तत्त्वचिंतन, संघटनेचे आत्मसत्व आणि कार्यसंस्कृतीचे सजीव वर्णन आहे. ग्रंथाच्या शेवटी दिलेली संघगीते, संचालन पद्धती, पूर्वोत्तर भारतातील सेवा कार्य, आणि मानव संसाधन प्रशिक्षण यांचा अभ्यासपूर्ण दस्तऐवज असल्यासारखा परिचय दिला आहे. परिशिष्‍टांचा  हा भाग संघाच्या कार्यपद्धतीचे प्रात्यक्षिक स्वरूप स्पष्ट करतात.

संघाच्या कार्यपद्धतीकडे अनेक जण बाह्य स्वरूपातून पाहतात, परंतु श्री नितिनजींनी  आंतरिक तत्त्वधारा, मूल्यप्रेरणा आणि माणूस घडवण्याची विज्ञानसिद्ध प्रक्रिया आपल्या लेखणीतून अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे.

या ग्रंथात ‘हिंदुत्व म्हणजेच मानवतावाद’, ‘राष्ट्रनिर्माण आणि संघटन’, ‘नक्षत्रमालेतील निरंतरता’, अशी प्रकरणे आहेत जी वाचतांना आपल्‍या जाणिवा अधिक समृध्‍द होत जातात, संघकार्य करतांना अनेक स्‍वयंसेवकांनी किती खस्‍ता खालल्‍या, आपले जीवन संघटनेला कसे स्‍वाहा केले हे वाचतांना मन भावविभोर होतं. विशेष म्हणजे हे सगळं व्यवस्थापन शास्त्राच्या पारंपरिक चौकटींपेक्षा वेगळं आहे  म्‍हणजेच संघकार्य हे एक ‘भारतीय व्यवस्थापनाचे उत्‍तम मॉडेल’ हे सोदाहरण या ग्रंथात वाचायला मिळतं. 

या ग्रंथात मानव संसाधन विकासाचे तत्त्वज्ञान आहे, संघटन शास्त्राचा आत्मा आहे, आणि राष्ट्रनिर्माणाची दिशा आहे. या ग्रंथाचे वाचन हे केवळ माहिती मिळवणे नाही, तर ‘मनुष्य घडवण्याची प्रक्रिया’ समजून घेण्याचं एक प्रकारचं प्रशिक्षण आहे असे म्‍हणता येईल.

आणखी विशेष म्‍हणजे या ग्रंथाला प्रसिद्ध तत्वचिंतक श्री. विवेक घळसासी यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना म्‍हणजे अमृतानूभवच. ही प्रस्‍तावना म्‍हणजे श्री विवेकजींच्‍या ओजस्‍वी लेखणीतून या संपूर्ण ग्रंथाची दिशा दर्शवणारा एक दैदीप्यमान दीपस्तंभ आहे. श्री नितिनजींच्‍या मनोगाभा-यातील भावनेला अगदी त्‍यांच्‍याच शब्‍दांत व्‍यक्‍त करण्‍याची किमया श्री शैलेशजी पांडे यांनी उत्‍तमपणे पार पाडली आहे. संघविश्‍वातील ऋषींना हा ग्रंथ समर्पित करून श्री नितीनजींनी  आपली कृतज्ञताच व्‍यक्‍त केली आहे. या ग्रंथनिर्मिती साठी सहकार्य करणा-या प्रज्ञावंतांची मांदीयाळी बघितली की एकुणच या विषयाची गुणवत्‍ता आणि महत्‍व लगेच अधोरखित होतं. 

मानवी व्यवस्थापन म्हणजे केवळ कौशल्य, धोरणे वा तंत्रज्ञान नव्हे, तर त्यामागील मूल्य दृष्टिकोन, सांस्कृतिक परंपरा, आणि समर्पित नेतृत्व हेच खरे स्तंभ असतात. श्री नितीन गडकरी यांच्या ‘संघातील मानवी व्यवस्थापन’ या ग्रंथात अशाच व्यवस्थापन दृष्टीकोनाची सखोल मांडणी केवळ विचारपूर्वकच नव्हे, तर स्वानुभवावर आधारित पद्धतीने केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व्यवस्थापन म्हणजे एका मूल्यविहित आणि ध्येयवेड्या स्वयंसेवकांद्वारे चालवलेली "सजीव संस्था" याचे हे पुस्तक साक्षात उदाहरण आहे. हा ग्रंथ वाचल्‍यावर   "जीवन तो वही, जो समाज को दिशा दे। लेखन वही, जो चेतना जागृत करे।" या ओळी या ग्रंथाबाबत अगदी सार्थ वाटतात.  

हा अनुभवसंपन्न ग्रंथ संघ कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक, प्रशिक्षणार्थींना पाठ्यपुस्तक, आणि चिंतनशील वाचकांसाठी प्रेरणाग्रंथ ठरतो. 

मा. श्री नितिनजींचे मनापासून अभिनंदन, त्रिवार अभिनंदन..!


         - प्रा. रविंद्र भुसारी,

         नागपूर