माळेगाव ता. मोताळा (युवा क्रांती वृत्तसेवा) : येथील आदिवासी वस्तीवर वनविभागाच्या आदेशानुसार 12 मे रोजी अतिक्रमण हटविण्याची मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये सुमारे 300 आदिवासी बांधव बेघर झाले असून, त्यांचा संपूर्ण संसार उघड्यावर आला आहे. गेल्या 20 ते 25 वर्षांपासून ही वस्ती त्या ठिकाणी वास्तव्यास होती, मात्र ती वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून वसलेली असल्याचा ठपका ठेवून सदर कारवाई करण्यात आली.
उघड्यावर आलेल्या आदिवासी बांधवांमध्ये अनेक लहान मुले, महिला तसेच वृद्धांचा समावेश आहे. या नागरिकांचा निवारा, अन्न, पाणी आणि वैद्यकीय सेवांसह इतर मुलभूत गरजा पूर्णपणे बाधित झाल्या आहेत. सध्या ते उघड्यावरच राहत असून, कोणतीही तात्पुरती व्यवस्था शासनाकडून करण्यात आलेली नाही.
या गंभीर परिस्थितीमुळे आदिवासी बांधवांमध्ये प्रचंड असंतोष असून, त्यांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. यासंदर्भात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, बुलढाणा यांच्या वतीने मोताळा तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात, उघड्यावर आलेल्या आदिवासी समाजासाठी तात्काळ निवारा व पुनर्वसनाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात सामाजिक अस्वस्थता पसरली असून, प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केले जात आहे.
Social Plugin