Breaking News

युवा क्रांती न्यूज या लोकप्रिय न्यूज चॅनेल ला महाराष्ट्रात प्रतिनिधी हवे आहेत...

"मैत्री : नात्यांपलीकडची " : स्‍व. गोपीनाथजी आणि स्‍व. भाऊसाहेबांचे भावस्‍मरण



महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कार्यकर्तृत्वाने तेजस्वी ठसा उमटविणारे दोन व्यक्तिमत्त्वं भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे आणि स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी परवा शेगांव येथे श्री बडा बालाजी मंदिराच्‍या सभागृहात  "मैत्री : नात्यांपलीकडची " हा श्रद्धांजलीपर कार्यक्रम नुकताच पार पडला.  

     या कार्यक्रमास प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित राहून या दोन्‍ही नेत्‍यांप्रती भावांजली अर्पित करण्‍याची संधी मिळाली. या कार्यक्रमास महाराष्ट्राचे कामगार मंत्री व स्व. भाऊसाहेब फुंडकर यांचे चिरंजीव श्री.आकाश फुंडकर व श्री. सागर फुंडकर हे उपस्थित होते.

     या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, हे स्मरण केवळ औपचारिक श्रद्धांजली नव्हते, तर ती दोन हृदयांतील नात्यांची, ऋणानुबंधांची आणि पक्ष संघटनेप्रती या दोन्‍ही नेत्‍यांनी केलेल्‍या समर्पणाचे  पुण्‍यस्‍मरणच होते. स्‍व. गोपीनाथ मुंडे आणि स्‍व. भाऊसाहेब फुंडकर हे दोघेही साधारण पार्श्वभूमीतील, पण एकाच ध्येयासाठी झपाटलेले कार्यकर्ते होते. दोघांचंही जीवन प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत उभं राहिलं. त्यांनी केवळ स्वतःची वाट निर्माण केली नाही, तर त्या वाटेवर असंख्‍यांना जोडत गावोगावी पक्षकार्याचा प्रचंड विस्‍तार केला. 

     स्व. गोपीनाथ मुंडे यांनी सर्वसामान्यांच्या भावना आणि संघर्ष आपल्या राजकारणात उतरवला होता. त्यांची वक्तृत्वशैली, मन जिंकणारा आत्मविश्वास आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची सवय ही त्यांची बलस्थाने होती. स्व. भाऊसाहेब फुंडकर हे अभ्यासू, शांत आणि विधायक दृष्टिकोन असलेले नेता होते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी व ग्रामीण महाराष्ट्रासाठी जे काम केलं, ते दीर्घकाळ स्‍मरणात राहणारे असेच आहे. 
 या कार्यक्रमास या दोन्‍ही नेत्‍यांसोबत काम करतांना आलेले अनुभव, या अनुभवातुन त्‍यांनी  संघटनेसाठी खाल्‍लेल्‍या खस्‍ता, पक्षकार्याच्‍या वृध्‍दीसाठी केलेल्‍या परिश्रमांची गाथा आणि  विशेष म्‍हणजे एकमेकांतील प्रचंड स्‍नेहबंध व मैत्रीचे अनेक प्रेरक प्रसंगांची उजळणी करतांना मन भावविभोर झालं. संकटाच्या काळात त्यांनी एकमेकांना खंबीर साथ दिली, आणि आपल्‍या मैत्रीचा सदुपयोग सदैव पक्षकार्यासाठीच केला. 
   ‘मैत्री: नात्यांपलीकडील’ हा कार्यक्रम केवळ एक श्रद्धांजली नव्हती, ती एक स्‍मरणयात्रा होती. आपल्‍या नेत्यांनी, कार्यकर्त्‍यांनी केलेल्‍या त्‍यागाचे, परिश्रमांचे स्‍मरण करीत, त्‍यातून प्रेरणा घेत भविष्‍यासाठी अधिक सक्षम होणं ही काळाची गरज होय.
भाजपचे येथील कार्यकर्ते श्री प्रदीपजी सांगळे यांच्‍या कल्‍पनेतून लोकनेते विचार मंच, शेगांव यांनी या हदयस्‍पर्शी सोहळयाचे आयोजन केले होते. प्रारंभी स्‍व. गोपीनाथजी, स्‍व. भाऊसाहेब व स्‍व. धनश्‍यामजी गांधी यांच्‍या प्रतिमेला पुष्‍पार्चन करण्‍यात आले. यानंतर पहलगांम येथे मृत्‍यूमुखी पडलेल्‍या नागरीकांना श्रध्‍दांजली देण्‍यात आली तर वणवे भगिनींनी  ‘एक वाट दोन दिप, प्रकाशाच्‍या शोधात ’ हे समर्पक गीत प्रस्‍तुत करून सोहळयास अधिकच भावपूर्ण केले. कार्यक्रमाचे श्री मनोहर अवचार यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उत्तम केले. 
अत्‍यंत कौटुंबिक वातावरणात संपन्‍न झालेल्‍या या कार्यक्रमाकरीता सभागृह कार्यकर्त्‍यांनी खच्‍चून भरले होते. यावेळी अनेक जुन्या-नव्या कार्यकर्त्यांच्या भेटीने मनाला उर्जा मिळाली आणि या सर्वांगसुंदर, स्‍मरणीय कार्यक्रमास उपस्थित राहील्‍याचे सार्थक वाटले. 

या कार्यक्रमाची यु-टयुब लिंक सोबत दिली आहे. 
https://youtu.be/s8RbGWOR_bI
                       - प्रा. रविंद्र भुसारी, 
                          नागपूर