सांगली (युवा क्रांती न्यूज) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी पोलीस दलाने सर्वतोपरी प्रयत्न करावेत, तसेच नविन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करून गुन्हेगारांना दोषी ठरवण्याचे प्रमाण वाढवावे, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. सांगली येथे पार पडलेल्या पोलीस दलाच्या गुन्हे आढावा बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी खटले निर्दोष सुटण्यामागील कारणांचा सखोल अभ्यास करून त्या त्रुटी दूर करण्याचे निर्देश दिले. आरोपी निर्दोष सुटण्याचे प्रमाण ज्या पोलीस ठाण्यांमध्ये जास्त आहे, तिथे विशेष लक्ष देऊन सुधारणा करावी, असेही त्यांनी सांगितले. या अनुषंगाने संबंधित पोलीस ठाण्यांचा स्वतंत्र आढावा घेण्यात यावा आणि आवश्यकतेनुसार सरकारी वकिलांशी समन्वय वाढवण्यासाठी बैठकांचे आयोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
ई-समन्स प्रणालीची नियमित व प्रभावी अंमलबजावणी करणे अत्यावश्यक असल्याचे अधोरेखित करत मुख्यमंत्री म्हणाले की, डिजिटल यंत्रणांचा योग्य वापर हा गुन्हेगारी नियंत्रणासाठी महत्त्वाचा ठरेल.
या महत्त्वपूर्ण बैठकीला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मनोजकुमार शर्मा, कोल्हापूर परिक्षेत्राचे प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत माहुरकर, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्यासह विविध वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत जिल्ह्यातील गुन्हेगारी चित्र, प्रलंबित खटले, दोषसिद्धीचे प्रमाण, आणि कायद्याची अंमलबजावणी या विषयांवर सखोल चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनामुळे जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाला अधिक कार्यक्षम आणि उत्तरदायी बनवण्याचा दिशेने पाऊल टाकण्यात आले आहे.
Social Plugin