‘आओ सभी मराठी लोक... हम आपका स्वागत करते है .. हम सब "छान" आहो.....चांगले है... काश्मीर आपका है’. पहलगामच्या आतंकवादी हल्ल्यानंतर पाचव्या दिवशी आम्ही ६४ मराठी पर्यटक जम्मू-काश्मीरच्या ऐतिहासिक राजधानी श्रीनगर येथे पोहोचलो.तिथे काय असेल? आपले कसे स्वागत होईल? हा प्रचंड तणाव असतानाच काश्मीरच्या लोकांनी आम्हाला श्रीनगरला उतरताच आश्चर्याचा धक्का दिला. पहेलगाम हल्ल्यानंतर आता पर्यटक येणार नाहीत, असे चिंतेचे सावट त्यांच्यावर असताना आम्ही पोहोचलो आणि त्यांनी आमचे अत्यंत कुतूहलाने व आनंदाने स्वागत केले.
मराठी पर्यटकांनी छातीला माती लावून आतंकवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये पाऊल ठेवणे खरं तर धैर्य व हिंमतीचे होते. ज्या दिवशी भ्याड हल्ला झाला त्याच दिवशी आम्ही काश्मीरच्या प्रवासासाठी नागपूर येथून निघालो होते. २२ एप्रिल २५ रोजी दुर्दैवी घटनेनंतर रात्री नागपूरच्या राहुल टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी द्वारा अमृतसर व्हाया श्रीनगर असा आमचा प्रवास सुरु होता. या दरम्यान मिनिटागणिक नातेवाईकांनी व मित्रांनी आम्हाला असा हल्ला झाल्याची माहिती देणे सुरु केले. खूप गंभीर स्थिती आहे परत फिरा’, अशी प्रत्येक जण विनंती करीत होते. जेथे नेटवर्क उपलब्ध आहे तेथे मोबाईलवर आंम्ही बातम्या पाहू लागलो. विविध वाहिन्यावर दाखविण्यात येत असलेले हल्ल्याचे कव्हरेज आणि त्याला दिलेला धार्मिक रंग यामुळे हल्ल्याची गंभीरता आम्हाला जाणवत होती. ‘परत फिरावे की काश्मीरला जावे’, अशी द्विधा मनस्थिती आमची झाली होती. पण बघूया काय होते ते?, असे पक्के ठरवून आम्ही काश्मीरला जाण्याचा निर्णय घेतला. आतंकवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला करून पर्यटकांनी काश्मीरमध्ये येऊच नये, अशी भीती या हल्ल्यातून निर्माण केली होती आणि त्या भीतीला उत्तर देण्यासाठी आपण जाऊ, असा निर्धार आम्ही सर्वांनी केला. आणि श्रीनगरला पोहोचल्यावर काश्मिरी लोकांनी आमचे जे स्वागत केले त्यामुळे आमची भीती पूर्णपणे निघून गेली.
काश्मिरी लोकांनी ‘चांगले ,छान’ या दोन मराठी शब्दांना ज्या पद्धतीने अवगत केले त्यावरून मराठी पर्यटकांशी त्यांची जुळलेली नाळ स्पष्टपणे आम्हाला जाणवली. काश्मिरी खोऱ्यात सर्वाधिक भटकंती करणारा ‘मराठी माणूस’ आहे हे सांगायला सुद्धा ते आम्हाला विसरले नाहीत. खरंतर आजकाल वृत्त वाहिन्या पराचा कावळा कसा करावा, असा सातत्याने प्रयत्न करतात. झालेल्या दुर्दैवी घटनेचे अतिरंजीत चित्रण करून समाजामध्ये भीती निर्माण करणे आणि सोबतीला तथाकथित राजकीय रंग देण्यात माध्यम पटाईत असतात, याचा सर्वस्वी अनुभव जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर येथील राजधानीत पाऊल टाकल्यानंतर आम्हा पर्यटकांना आला. काश्मीर येथे मात्र प्रसार माध्यमांनी रंगवलेल्याबातमीतला एक छदाम अंश सुद्धा आम्हाला दिसत नव्हता. श्रीनगर मधील अमन और शांतता व सौदार्याचे वातावरण होते. दुर्दैवी घटनेचे प्रचंड निषेध, दुःख व खिन्नता मात्र जाणवत होती. पण माध्यमांनी घातलेल्या प्रचंड भीतीमुळे पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झालेली जाणवत होती. सलग चार दिवसात एकही पर्यटक पोहोचला नसल्याच्या पार्श्वभूमीवर पाचव्या दिवशी देशभरातून प्रथमच आम्ही ६४ मराठी पर्यटक काश्मीरला पोहोचलो याचा आम्हाला आनंद झाला होता. आमच्या पेक्षाही अधिक आनंद पर्यटकांचे आगमन झाल्याचे पाहून काश्मिरी लोकांना झाला होता. आणि हा आनंद त्यांच्या कृतीतून आणि डोळ्यातून, चेहऱ्यावरून आम्हाला स्पष्ट दिसत होता.
आम्ही ऐतिहासिक हजरत बाल दर्गा, नसीम बाग, श्रीनगर येथे एका हॉटेलला मुक्कामाला थांबलो. तिथे आजूबाजूच्या वातावरणात शांतता, आतिथ्य भाव जाणवत होता. काश्मिरी लोकांच्या नजरा सुद्धा आमच्या नजरेशी जुळताना ‘आपण सारे भारतीय आहोत’ हा भाव उमटत होता. समाज माध्यमे, वाहिन्यांनी मात्र आतंकवादी घटनेनंतर सबंध काश्मिरी लोकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्यामुळे ते दुःख सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होते.
श्रीनगर मध्ये तब्बल चार दिवस आम्ही मुक्कामी होतो. ६४ मराठी पर्यटक मुक्तपणे श्रीनगरच्या परिसरात संचार करताना कुठेही परभाव आम्हाला जाणवला नाही. आम्ही पाच ते सहा च्या गटाने एका ऑटोत लाल चौकात जाण्याचा ठरवलं. त्या ऑटो चालकाचे नाव इम्रान होते. इम्रान आम्हाला म्हणाला "पिछले चार दिनों से श्रीनगर मे कोई भी पर्यटक नही आया, लेकिन आज इतनी बडी संख्या मे आप आये हो, आपका हम स्वागत करते है.हमे अच्छा लगा की आप हमे भाई मानते हो’.
‘आम्ही त्याला आतंकवादी हल्ला विषयी विचारलं. तो म्हणाला, ‘जो कुछ हुआ है अल्ला उसे माफ नही करेगा. भाईसाब हम अपने पेट पर क्यू लाथ मारेंगे? ऐसा घटिया काम कोई काश्मिरी नही कर सकता. पिछले चार दिनों से एक भी पर्यटक न आने की वजह से घर पे जब हम जाते है तो हमारे जेब मे सौ रुपये भी नही रहते. हम क्या करे ?अल्ला दरिंदो को माफ नही करेगा’... असे म्हणत त्याच्या डोळ्यात अश्रू ओघळू लागले.
आम्ही ऐतिहासिक जामा मज्जित कडे घेऊन जावं असं त्याला सुचवलं. झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर तिथे जाणे अधिक धोक्याचे वाटत होते. पण इम्रानने मात्र आम्हाला सकारात्मक केलं. श्रीनगरचं मूळ रूप, सस्कृती जर तुम्हाला पाहायचं असेल तर या ऐतिहासिक मशिदीच्या अवतीभोवती विस्तारलेली सुप्रसिद्ध बाजारपेठ, मूळ काश्मिरी लोकांचे व्यवहार, राहणीमान त्याचा परिचय येथेच होतो. १४ व्या शतकात स्थापन झालेली जामा मशिद, ऐतिहासिक बांधकाम, स्थापत्यशैली, त्याचे चबुतरे व एकाच वेळी तीन लाखाहून अधिक लोकांना नमाज अदा करण्यासाठी भव्यमंडप, हे वैशिष्ट्य पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो. मशीद पाहताना नमाज अदा करण्याची वेळ झाली होती त्यात आम्ही सामील होताना "राम रहीमची" भावना आमच्या मनात निर्माण झाली.अनेक काश्मिरी लोकांनी आमच्याशी बोलताना "हमारे भारत में अमन रहे " यावर भर दिला.
मशिदीच्या अवतीभोवती विस्तारलेल्या बाजारपेठे मधील भटकंती इतकी सामान्य आणि सहज होती की आपण सोयऱ्यांमध्ये वावरत आहोत असा सकारात्मक भाव त्यांच्या डोळ्यात दिसत होता. समाज माध्यमे व वृत्तवाहिन्या मात्र दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर अतिरंजीत बातम्या देऊन लोकांमध्ये दुहीची भावना निर्माण करणं हे किती चुकीचे आहे हे आम्हाला जामा माशिद्च्या परिसरात मुक्तपणे फिरताना जाणवले. तुकोबांच्या भाषेत" सत्य असत्याशी मन केले ग्वाही" हे असेच आपण जर वागलो तरच आपल्याला सत्यता कळेल.
श्रीनगर मधील सुप्रसिद्ध ऐतिहासिक लाल चौकात आणि त्या अवतीभवती विस्तारलेल्या बाजारपेठेत आणि दुकानदाराशी असणारा आमचा व्यवहार सहज आणि बंधुभावाचा होता. या परिसरात आम्ही भटकंती करत होतो तेव्हा सायंकाळची वेळ होती. या ठिकाणी नमाज अदा करण्याचे आणि मंदिरातील आरतीचेव गुरुद्वारा मधील प्रार्थनेचे सूर एकाच वेळी गुंजत असताना माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. आपल्या अखिल हिंदुस्थानातील "सर्वधर्मसमभावाची "ही सदभावना अशीच वृद्धीगत होवो, असे मनोमन वाटत होते. काश्मिरी लोकांचं आदरातीत्य, त्यांचा आमच्याशी असणारा बंधू भावाचा व्यवहार आणि झालेल्या घटनेबद्दल प्रचंड निषेधाची भावना यामधून आम्ही सारे भारतीय आहोत ही जाणिव वृद्धींगत होत असताना माध्यमांनी देशभर रंगवलेली हिंदू – स्लीम द्वेषाच्या भावनेची अक्षरशा कीव येत होती. खरंच आपल्यासमोर रंगवलेल्या कथा आणि प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट मात्र यात किती फरक असतो हे पहिल्यांदा मला समजत होतं.
श्रीनगरचा सुप्रसिद्ध दाल लेक आणि त्यातील असणारा शिकारा पॉईंट हा तर जगप्रसिद्ध मानला जातो. तिथे शिकारात बसून श्रीनगरच्या त्या झीलचे सौंदर्य अनुभवताना होडी चालवणारा अब्दुल रशीद मला म्हणाला, ‘भाईसाहेब इस घटना के बाद पहले आप टुरिस्ट हो जिनको लेकर हम झील मे घूम रहे है. यहा तो लाखो की भीड रहती है, लेकिन इस घटना के बाद हमे बडी खिन्नता है. हमारे काश्मीर का क्या होगा अल्लाह ही जाने, लेकिन हम तो मर जायेंगे. ये हादसा बडी साजिश है. कश्मीरी इसे कभी अंजाम नही दे सकता. हे बोलताना रशीदच्या डोळ्यातील प्रचंड दुःख मला पहावत नव्हते. हे खरं आहे की आता पर्यटकांनी जवळपास काश्मीर कडे पाठ फिरवल्याचे चित्र आम्हाला दिसत होते.
काश्मीरमध्ये १५ ऑगस्ट २५ पर्यंत पर्यटकांचे प्रचंड आरक्षण होते ते सर्व रद्द झाल्याने व्यावसायिकांचे करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचे एका हॉटेल चालकाने सांगितले. काश्मिरी व्यावसायिकांसमोर आता पुढे काय होईल? असा प्रश्न निर्माण झाला असून भविष्याची चिंता त्यांच्यात स्पष्ट जाणवत होती.
श्रीनगरच्या अवतीभवती असणाऱ्या गुलबर्ग, सोनबर्ग येथे भेटी देतानाच पहलगाममधील भेट मात्र अंगावर रोमांच आणणारी होती. तितक्याच हिमतीने तिथे फोटोसेशन करताना निसर्गाचा आनंद घेता आला. पहलगामचे रस्ते सुनसान झालेले... कारोबार ठप्प पडलेला अशी स्थिती पाहताना आम्हालाही दुःख होत होते. गुलबर्गाच्या टॉपवर हिमालयाच्या बर्फाळ कुशीत वावरताना खरंच काश्मीर भारताचे नंदनवन आहे, स्वर्ग आहे, हे निश्चित जाणवत होते. साडेतेरा हजार फूट उंचीवर एनडीटीव्ही वाल्यांनी माझी मुलाखत घेतली. त्यात मी म्हटले की, ‘इन हादसोसे डर पैदा करना., भाईचारा खतम करना हे,यह आतंकवादियो का उद्देश था, इसे अगर हम जवाब देना चाहते है तो हमे काश्मीर मे आना चाहिए, काश्मीर हमारा है, यहा के लोग हमारे भाई है’.
ऐतिहासिक अशा आदी शंकराचार्य यांनी स्थापन केलेल्या महादेवाच्या मंदिरात अब्दुल रशीद घेऊन जात असतानाच त्यांने महादेवाच्या मंदिराबाबतचे अनेक ऐतिहासिक संदर्भ आम्हाला सागितले. हजारो वर्षा आधी कश्यप ऋषींने पवित्र पाण्याची भूमी असणाऱ्या अनेक प्रवाहांना मार्गस्थ केले व तेथे नागरी वसाहतीला प्रारंभ केला म्हणूनच त्यांच्या नावावरूनच काश्मीर हे या प्रदेशाला नाव पडले. याच काश्मीरच्या राजधानीत श्रीनगरच्या मधोमध उंच पर्वतावर महादेवाचे हे चौथ्या शतकातले अद्वितीय मंदिर आहे. तिथून श्रीनगरचे विहंगम दृश्य हिंदू मुस्लिम भाईचाराचे प्रतीक वाटत होते. मंदिरातील वेदमंत्राचे उच्चारण एक पवित्र भाव वातावरणात निर्माण करताना माणूसपणाची भावना प्रेरित करणारी वाटली.
आतंकवादी घटनेच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानातल्या प्रत्येकाने काश्मीरकडे पाठ न फिरवता स्वर्ग सम निसर्गाचा स्वानंद घेण्यासाठी आणि "काश्मीर हमारा है और रहेगा" हे सर्वांना बजावण्यासाठी येथे आलेच पाहिजे असे मला मनोमन वाटते. कश्मीरी लोक हे मुळातच खूप गरीब ,सोज्वळ आणि तेवढेच मेहमाननवाजी आहेत. पर्यटन हाच त्यांचा पोटापाण्याचा धंदा आहे. खरंच ते आपल्या पोटावर लाथ मारतील काय? हे मनाला पटत नाही. मागील पाच वर्षात काश्मीरमध्ये पर्यटनाचा विस्तार झाला. कश्मीरी लोकांनी हे लक्षात घेता कमावलेले सारे काही या पर्यटन व्यवसायात गुंतवणूक विकास केला. देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी त्यांच्या स्तरावर सुविधा सुद्धा करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
केंद्र सरकारने 370 कलम रद्द केल्यानंतर काश्मीर अधिक शांत झाले काश्मिरी लोकांचा बराचसा राग हा तिथे वर्षानुवर्ष तैनात केलेल्या सुरक्षाकर्मी, प्रशासन यावर असू शकेल या बदल नेहमी चर्चा होते .पण पर्यटकावर यापूर्वी कधीही हल्ला झाला नाही कारण पर्यटकाला ते प्रेषित मानतात. या पार्श्वभूमीवर काश्मीरच्या इतिहासात पर्यटकावर पहिल्यांदा घाला घालण्याचं आतंकवाद्यांनी काम केलं. या पाठीमागे अनेक कांगोरे आहेत हे मात्र सामान्य काश्मिरी लोकांना सुद्धा आज समजत आहे पण करणार तरी काय? अनेक प्रकारचे कॉर्पोरेट, आंतरराष्ट्रीय आर्थिक हितसंबंध, कथित राजकारण यात अडकले आहे.
आतंकवाद्यांच्या दुर्दैवी हल्ल्यानंतर देशातील आम्ही प्रथम पर्यटक पाचव्या दिवशी तेथे पोहोचलो. तिथला हा "ग्राउंड रिपोर्ट"तयार केला. एखाद्या घटनेचे किती जाणीवपूर्वक चुकीचे वृत्तांकन वृत्तवाहिन्या करतात हे प्रत्यक्ष अनुभवले. मला दुःख याचे आहे की, अशा या घटनांनी देश, माणसं तुटतात, याची जाणीव वृत्त वाहिन्यांना का होत नाही. फक्त टीआरपी वाढविण्यासाठी अतिरंजित वृत्तांकन करून या वाहिन्या केवळ धार्मिक रंग देऊन जनतेमध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न तर करीत आहेतच पण देशाच्या अखंडतेला आणि एकात्मतेला देखील धोका पोहोचवत आहेत. लोकशाहीला या वाहिन्या प्रचंड धक्का देत आहेत. काश्मीरच्या या अद्भुत, सुंदर, रोमांच आणणाऱ्या निसर्गाचा व काश्मिरी लोकांच्या आतिथ्यशीलतेचा स्वानुभव घेत खरंच जगाचा स्वर्ग कोठे असेल तर तो काश्मीरमध्ये आहे, हे मनाला बजावत आम्ही महाराष्ट्रात सुखरूप पोहोचलो. काश्मीर आपले आहे, काश्मीर खोऱ्यात अमन और शांतता नांदावी आणि तेथील आपल्या बांधवांना शांततामय व सुखी जीवन देण्यासाठी आपण पर्यटक म्हणून मोठ्या संख्येने काश्मीरला जावे, त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलवावा, अशी सर्व भारतीयांकडून अपेक्षा आहे.
- डॉ. राजेश मिरगे,
श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावती.
मोबाईल – ९४०४७१०५५८
Social Plugin