गडचिरोली (जिल्हा प्रतिनिधी) :
वडिलांचे छत्र पंधरा वर्षांपूर्वी हरवल्यानंतर, नारायणने आईसोबत मजुरी व शेती करून संसाराची स्वप्नं पाहिली होती, पण लग्नानंतरच्या पहिल्याच प्रवासात पोटदुखीमुळे त्याने नववधूच्या मांडीवर डोके ठेवून प्राण सोडला.ही घटना गावात हळहळ व्यक्त करणारी ठरली.
गडचिरोली जिल्ह्यातील कोरची
तालुक्यातील गहाणेगोटा येथील
नारायण कंवलसिंह बोगा वय २६ हा शेती व मजुरीकाम करत होता,नारायणच्या लहानपणी म्हणजेच 15 वर्षापूर्वी वडिलांचे निधन झाले. तेव्हापासून आई आणि नारायण दोघेच राहायचे. परिस्थितीशी दोन हात करत माय-लेकरे गुजराण करत होते. उपवर झाल्यानंतर नारायणसाठी स्थळ शोधणे सुरू झाले. ३० एप्रिलला छत्तीसगड राज्यातील मानपूर-चौकी तालुक्यातील माधोपुर येथील फिरूराम कुमेटी यांच्या दीपिका या मुलीशी त्याचा रितीरिवाजाप्रमाणे विवाह झाला. दुसऱ्या दिवशी १ मे रोजी नारायणने गावी
स्वागत समारंभ घेतला. यावेळी त्याने गोडधोड जेवणाचा बेत आखला होता. लग्नाच्या दिवशी पोटात दुखत असल्याचे त्याने नातेवाइकांना सांगितले होते. त्यामुळे स्वागत समारंभाच्या दिवशी तो बेतकाठी येथील एका खासगी दवाखान्यात जाऊन उपचार घेऊन परतला. २ मे रोजी देखील त्याची प्रकृती बरी होती. मात्र, ३ मे रोजी पुन्हा त्याच्या पोटात वेदना सुरू झाल्या. त्यामुळे नववधू दीपिका व एका मित्राला सोबत घेऊन दुचाकीवरून तो वासळी येथील दवाखान्यात जाण्यास निघाला, परंतु बोरी गावाजवळ जाताच त्याची प्रकृती अधिकच बिघडली. मोटारसायकल थांबवून त्याने नववधूच्या मांडीवर डोके टेकवले आणि प्राण सोडला. विशेष म्हणजे नारायण स्वतः दुचाकी चालवित होता. लग्नानंतर पत्नीसोबतचा त्याचा पहिलाच प्रवास होता, परंतु नियतीच्या मनात वेगळेच होते.
Social Plugin